Tuesday, November 18, 2014

महासत्ता आणि शौचालय

महाराष्ट्रात दशकभरापूर्वी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू झाले. यासाठी विविध अनुदान योजना आणि स्पर्धांद्वारे खेड्यांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न सरकारने केला. या योजनेला किती यश मिळाले, हा भाग वेगळा. पण बुलढाणा जिल्ह्यातील सुरेश बुरकुल आणि वाशिम जिल्ह्यातील संगीता ओव्हाळे यांनी मात्र स्वच्छतेचा एक नवा आदर्श घालून दिला आहे. विशेष म्हणजे ज्या संत गाडगे महाराजांच्या नावाने हे अभियान चालवले जाते ते स्वतः विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील आणि ज्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ते देखील विदर्भातील हा योगायोगच. 

बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षक सुरेश बुरकुल यांच्या वडीलांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या तिसऱ्याच्या विधीदिवशी बुरकुल सर आणि त्यांच्या भावंडांनी ठरवले की वडिलांच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी येणारा खर्च टाळून गावातील महिलांसाठी सार्वजनिक शौचालय बांधायचे. त्यानुसार गावातील बंद अवस्थेत असलेल्या शौचालयाच्या जागी त्यांनी नवीन शौचालय उभारण्यास सुरुवातही केली. 

खरं तर यापूर्वीही बुरकुल कुटुंबियांनी असे उपक्रम राबवले आहेत. मुळचे बुलढाण्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील सावंगी टेकाळे या गावचे ते रहिवासी असून त्यांची नोकरी बदलीची आहे. त्यामुळे यापूर्वी त्यांनी प्रत्येक बदलीच्या ठिकाणी स्वखर्चातून शौचालय बांधली आहेत. ज्यामध्ये सातेफळमध्ये तीन तर बुडखेडा गावात पाच शौचालये उभारली आहेत. परंतु १३ व्याच्या विधीसाठी खर्च होणाऱ्या पैशांचा असा सदुपयोग करून त्यांनी धार्मिक कार्य आणि सामाजिक काम यांची सांगड घालून समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिला.

बुरकुल यांच्याप्रमाणे संगिता ओव्हाळ यांचे कामही उल्लेखनीय आहे. भारतीय परंपरेत घरातील सोने विकताना दहा वेळा विचार केला जातो. त्यात विवाहीतेच्या आयुष्यात तर मंगळसूत्राला परंपरेत अनन्य साधारण महत्व आहे. अशा वेळी घरात शौचालय बांधण्याच्या आग्रहापोटी त्यांनी स्वतःचे मंगळसूत्र गहाण ठेवले. उघड्‌यावर शौचालयाला बसल्यामुळं आपल्याला जो मानसिक त्रास आणि कुंचबणा सहन करावी लागली, ती आपल्या मुलीच्या वाटेला येऊ नये म्हणूनच त्यांनी उचललेले हे पाऊल खरोखर उल्लेखनीय आहे.

घरातच शौचालय बांधण्यासाठी संगिता यांनी अनेक दिवस आपल्या पतीकडे तगादा लावला होता. मात्र सर्वसामान्य गरीबाच्या घरात अन्य प्रश्नांसमोर शौचालयाचा प्रश्न किरकोळ असतो. त्यामुळे त्यांना घरातून सतत नकार मिळत होता. पण संगिता आपल्या निश्चयावर ठाम होत्या त्यामुळे त्यांनी स्वतःच पैसे उभे करण्याचे ठरवले. खूप विचार केला आणि अखेर त्यांनी आपले मंगळसूत्र गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला. परस्पर त्यांनी तो आमलातही आणला आणि शौचालय बांधून घेतले. त्यांचा हा निर्णय किती धाडसी असू शकतो याची कल्पना कोणतीही स्त्री निश्चित करू शकते. 

आज संगीता यांच्या या धाडसाचं कौतुक खुद्द नवनियुक्त ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी केलं आहे. त्यांनी संगिता यांनी गहाण ठेवलेलं मंगळसूत्र मिळवून संगिताला परत केले. संगितासाठी हाच तिचा सर्वात मोठा सन्मान आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूकीपूर्वी देशात देवालयांपेक्षा शौचालयांची जास्त गरज आहे. अशी भूमिका मांडली होती. भारत २०२० ला महासत्ता म्हणून जगासमोर येणार, असं अर्थतज्ज्ञदेखील म्हणतात. महासत्ता होण्यासाठी लागणारे लोकसंख्या, क्षेत्रफळ, नैसर्गिक साधनसंपत्ती, कुशल होत चाललेलं मनुष्यबळ, महत्त्वाचं म्हणजे जगातील सर्वात मोठी लोकशाही असे बहुतेक सर्व घटकही आपल्याकडे आहेतच. परंतु, शौचालयासारखी म्हटलं तर क्षुल्लक, पण महिलांच्या सन्मान अत्यंत महत्वाचा घटकाची मात्र वानवा आहे. महासत्ता होण्यासाठी वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छता राखण्याचे मोठे आव्हान केंद्र सरकारने भारत स्वच्छ अभियान राबवून स्वीकारलं आहे. या आव्हानाचा पायाच जणू सुरेश बुरकुल आणि संगिता ओव्हाळे यांनी रचला आहे. त्याचबरोबर प्रचलित व्यवस्थेला छेद देण्याचेही धाडस त्यांनी दाखवले आहे. त्यांच्या या धडसाचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे. 

Wednesday, September 10, 2014

नव्या अॅपल फोनच्या निमित्ताने...

मोबाईलच्या दुनियेत क्रांती केली या अॅपलवाल्यांनी. टचस्क्रिन आणलं. अॅपल स्टोअर. आय पॅड, आय पॉड आणि आय फोन. मग अपडेट वर्जन्स. मग हळू हळू कळत गेलं तसं अँड्रॉइड त्याच्यापेक्षा भारी वाटू लागलं. मग पुन्हा साक्षात्कार झाला. ओएस (वापरकर्ती यंत्रणा) कोणतही असो अॅप्सच सर्वांचे बाप आहेत. ज्या ओएसमध्ये आपले लाडके अॅप्स चालतील, तोच फोन आपला. म्हणून तर मी विंडोज विकला. आता रोज नवे नवे फोन येतायत. नवे अॅप्स येतायत. वाय फायही स्टेशनवर फुकट मिळायला लागलय. मग काय घ्या नवे अॅप्स. करा अपडेट.

पण एक गोष्ट नक्की. या अॅप्सपायी माणसा माणसातले गॅप्स मात्र वाढत चाललेत. खरंच स्वानुभवावरून सांगतोय. बाजूला बसलो असलो तरी बोलण्यापेक्षा त्या चार-पाच इंचातच जीव गुंतलेला असतो. एखादा जवळचा आजारी पडला की उपचार करायला जशी धावपळ होते, नेमकी तशीच घालमेल बॅटरी डिस्चार्ज झाल्यावर चार्जर शोधण्यासाठी करावी लागते. हल्ली तर म्हणे सार्वजनिक जागेवर चार्जिंगसाठी लावलेले मोबाईलचे चार्जर चोरीला जाऊ लागलेत. मोबाईल तो सबके पास होता है ना, पर ऐन टाईमको चार्जर किसी के भी पास नही होता... तो उठाव.

पण काहिहि असो. या अॅप्सनी रिकाम्याला जगण्याच्या नव्या लेव्हल (कँडी क्रशच्या) दिल्यायत. जे स्मार्ट नव्हते, त्यांना पाच-दहा हजारात स्मार्ट होण्याची संधी मिळाली. राजू मिस गाईड ड्रायवरला गुगल नॅविगेशनं, शेखी मिरवणाऱ्या इलिटांना ट्विटर. लोककौतुकास हपापलेल्यांना सेल्फी झळकवण्याचं फेसबुकसारखं हक्काच व्यासपीठ. शाळेतून, कॉलेजातून, जुन्या ऑफिसातून, चाळीच्या मंडळातून, ट्रेनच्या त्या ठरलेल्या डब्यातून आणि कुठून कुठून तुटलेल्या, नव्याने जोडलेल्या, जोडू पाहणाऱ्या आपल्या सर्वांना व्हॉट्सअॅपचं वरदान मिळालं. किती किती ते जोक्स. क्रिएटिव्हीटेचे आगारंच जणू. व्हेज म्हणा, नॉन व्हेज म्हणा प्रत्येकासाठी वेगळा ग्रुप. जे नव्हते कोणाच्या गिनतीच ते झाले ग्रुर अॅडमिन. काय काय कौतुक करावं तेवढ कमीच की! 
(थोडसं विषयातंर - मध्यंतरी गावाला गेलो होतो. बीडला. मनात फार कणव आणून मित्रांबरोबर दुष्काळावर चर्चा करत होतो. यंदा पाऊस नाही पडला, तर काय होईल याची. पत्रकार म्हणून म्हणालो, काही मदत लागली तर सांगा. मंत्रालयाच्या आजूबाजूलाच असतो. शेवटी आपणही काही गावचं देणं लागतो. त्यातल्या एकाने लगेचच लांबलचक मोबाईल काढला. म्हणाला, “तुम्ही वाट्सअपवर हाय का ? आपल्या सैयद बाबा दर्गा वारणीकरग्रुपवर जमा करतो तुम्हाला. सर्व खबरबात भेटत जाईल“. च्यामायला माझ्या छोट्या मोबाईलची मला त्यादिवशी जाम चीड आली.. असो)

हा तर विषय असा आहे की, खरच गॅप्स वाढलेत का? व्यक्तिनुरूप अनुभव वेगवेगळे असतीलही. पण याची झलक प्रत्येकाला एकदातरी अनुभवास आली असेलच. पूर्वी कुणाला टाळायचं असल्यास हातात वर्तमानपत्र किंवा जाडजूड पुस्तक घेवून त्यात लोक घुसून बसायचे. हल्ली एखाद्याला टाळायचं असेल, तर शंभर नंबरी उपाय एकच. पंजाएवढा मोबाईल काढा. त्याच्यावर बोट फिरवत बसा. समोरच्यालाही वाटतं. आयला मलाच का नोटीफिकेशन यायना. किबंहूना चारचौघात मोबाईलमध्ये घुसलेली व्यक्ती एकतर अॅटिट्यूड तरी दाखवतेय किंवा खरंच आपल्याला काहिच नोटीफिकेशन येत नाहीयेत. याची शंका मनात आल्यावाचून राहत नाही.

चळवळी थंड झाल्यापासून आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची लईच गोची झालीय. असं वाटतं सरकारने काही अॅप्स स्वत:हून बनवले पाहिजेत. म्हणजे मेणबत्ती पंथीयासाठी. शाई फेकून तोंड काळ करणाऱ्यांसाठी. चप्पल भिरकवण्यासाठी. काळे झेंडे दाखवण्यासाठी नवे अॅप्स. म्हणजे ज्याच्यासाठी किंवा ज्याच्याविरोधात आंदोलन करायचे आहे, त्याचा फोटो सिलेक्ट करा आणि अॅक्शन. मला आठवतयं जॉर्ज बुशवर चप्पल फेकण्याचा गेम निघाला होता. हा, तसंच इंडियन वर्जन अॅप्स. म्हणजे काय पोलीस बंदोबस्त, लाठीमार, अश्रूधूर यापासून पोलिसांचा तरी जीव सुटेल.



मध्यंतरी सोशल कट्ट्यावर एक इमेज पाहिली होती. एका मैदानाच्या मध्यभागी एक लहान मुलगा पायाखाली फुटबॉल घेऊन उभा आहे. मैदानाच्या चहुबाजूंनी इतर मुलं बसली आहेत. पण खेळायला कुणीच येत नाही. सर्वांच्या हातात 'गॅझेट्स' आहेत. ते त्यातच गेम खेळत बसली होती. फार बोलका आणि जिवंत संदेश होता त्यात. आता तर मोठ्यांवरही अशा इमेजेस बनतीलच. मग त्याही याच मोबाईल अॅप्समधून वायरल होतील. आपली हळहळ, आपल्या भावना, संवेदनाही इथंच ऑनलाईन व्यक्त होतील. फॉलोअर्सच्या कमेंट्स, लाईक्सही मिळतील. काही उभे, आडवे अंगठे भेटतील. काहीजण हसऱ्या बाहुल्या पाठवतील. सगळा संवाद कसा आदिम संस्कृतीप्रमाणे. चिन्हांवर आधारीत.

Tuesday, April 8, 2014

दिल देखो, कपडा मत देखो...!

मुंबई आणि मुंबईची लोकल. त्यात रोज प्रवास करणारे लाखो प्रवासी. ट्रेन लेट झाली, अपघात झाला, बसायला जागा नाही, कुणाच भांडण तर कुणाचा मोबाईल किंवा पाकीट मारलं... अशा घटना तर रोज होत असतातच. याच्या व्यतिरिक्तही घडत असतात मानवी मनाचं, स्वभावाचं प्रतिबिंब उमटवणारे हजारो प्रसंग. त्यातलाच हा एक.
....

विरारहून चर्चगेटकडे निघालेली फास्ट लोकल. सेकंड आणि फर्स्ट क्लास दोन्ही डबे खच्चून भरलेले. येणाऱ्या स्टेशनला कुणी उठतयं का? या आशाळभूत नजरेणे उभे असलेले लोक आजूबाजुला पाहत होते. दादरला काही सिट रिकाम्या झाल्या. त्या सिटवर कोण बसणार यावरुन उभे असलेल्या दोन लोकात वाद सुरु झाला. त्यातला एकाच्या हातात अंगठ्या, गळ्यात चैन, इस्त्रीचे कपडे आणि कसल्याशा डिओचा वास... असा फर्स्ट क्लासला साजेसा अवतार. दुसरा सडसडीत, मळकटलेला. चेहऱ्यावर निरागस भाव, टाइमपास चित्रपटाच्या भाषेत गलपटलेला. सेकंड क्लासला साजेसा असा माणूस.
खरतर वाद होता, मोकळ्या जागेवर कोण बसणार. पण अचानक वादाचं स्वरुप स्टँडर्डने (उच्च, निच्च... वैगरे वैगरे) घेतलं. स्वतःला फर्स्ट क्लास समजणारा व्यक्ती भलताच तापला. तुम्हीरी औकात नही है, विदाऊट तिकीट फर्स्ट क्लासमे घुसते हो... कहा कहा से आ जाते है (पुढे माता-भगिणींचा उद्धार). ‘साफ-सुफ कपडा पेहना तो. सिर्फ तुम लोक ही आ सकता है क्या फर्स्ट क्लास मे, दुसराही तोडक्या मोडक्या भाषेत उत्तर देत होता. शेवटी वाद तिकिटावर आला. एकमेकांचे तिकिट दाखवण्याची मागणी होऊ लागली. चल तिकिट दिखा... दिखा तिकिट... फर्स्ट क्लासवाल्यासोबत आता इतरही ओरडू लागले. मै क्यों दिखाऊ, तू क्या टिसी है क्या ? तर्कावर आधारीत त्याचे प्रश्न.
पाकिटमार पकडल्यावर उंदरालाही घाबरणारेजसं सामुहिक धुलाईत हात धुवून घेतात. त्या वर्गवारितले लोक आजु-बाजूला जमा व्हायला लागले. एका उत्साहिताने पुढाकार घेवून दोघांनाही तिकिट दाखवण्याची तंबी दिली. पहिला तर तयारच होता. तिकिट दाखवून मोकळा झाला. जसं काही राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचं प्रमाणपत्र दाखवत होता जणू. आता दुसऱ्याची पाळी होती. बाजूलाच जाळीपलीकडे सेकंड क्लासचा डबा होता. तिथलीही मंडळी नजरे रोखून पाहायला लागली. अगर मेरे पास तिकिट होगा, तो आप मुझे क्या देंगे त्याचा बालिश प्रतिवाद सुरुच होता. हा काही दाद देईना म्हणून समोरच्याने बाह्या सरकवायला सुरुवात केली. आता राडा निश्चित. काही लोक समजवयाला लागले, असेल तिकिट तर दाखवून टाक. आपल्या कपड्यावरुन आपली लायकी काढली जावी, हे काही दुसऱ्याला सहन होत नव्हतं. न राहवून त्याने खिशातून फाटलेलं पाकिट काढलं. तीन महिन्यांचा फर्स्ट क्लासचा पास बाहेर काढला. कोर्टात बचाव पक्षाच्या वकीलाने एखादा पुरावा काढून तोडांवर मारावा या थाटात सर्वांना पास दाखवायला लागला.
सगळेच शांत झाले. न्यायनिवाडा करायला मधे पडलेला तिसरा माणूस सुमडीत निघून गेला. ज्याने वाद चालू केला तो मात्र गलीतगात्र झाला. सेकंड क्लास डब्यातली लोकं तर टाळ्या पिटायला लागली. जसं काय त्यांचाच विजय झालाय. अब उसको दो खींचके दे, सेकंड क्लासवाले ओरडायला लागले. सिर्फ कपडेसे आदमी फर्स्ट क्लास होता है क्या, तुम साले टॅक्स बुडानेवाले और अच्छा कपडा पेहननेवालेही विदाऊट घुमते हो, आता दुसऱ्याचाही  तोडांचा पट्टा चालू झाला. एका क्षणात गेम पलटला होता. क्षणापूर्वी जे लोक याला लुख्खा समजत होते, ते सर्व आता त्याच्या बाजूने बोलायला लागले. कपड्यावरुन कोणाचा स्तर ठरत नसतो. याची अचानक सगळ्यांना उपरती झाली.
आपणे आज हमे एक नई चीज सीखाई है, कपडे से आदमी की पहचान नही होती. ज्येष्ठ मंडळी बौद्धीक पाझळू लागली. दिल को देखो, कपडा मत देखो... उत्साहि तरुणही मागे नव्हते.
एकाच ट्रेनमध्ये तासाभराच्या प्रवासात कितीतरी भाव-भावनांचा रंगतदार सामना या प्रसंगामुळे पाहायला मिळाला. कपडे, देह, चेहऱ्यावरुन उच्च-नीच्च पातळी ठरवणारी प्रतिगामी भारतीय संस्कृतीची पाळमुळ आजही सुशिक्षित लोकांच्या मनात शाबूत आहेत, हे यावरुन दिसलं. तरिही खरेपणा अजून मेलेला नाही. गरीब असलो तरी कुणापेक्षा कमी नाही, हा मौलिक विचार त्या फर्स्ट क्लासमधल्या क्लासलेस माणसाकडून नक्कीच मिळाला.

Facebook Link : https://www.facebook.com/ajax/sharer/?s=99&appid=2309869772&p%5B0%5D=100001463787670&p%5B1%5D=674198872638899&profile_id=100001463787670&share_source_type=unknown

Sunday, January 26, 2014

काही न विसरता येणारं

नुकतीच साने गुरूजी राष्ट्रीय स्मारकाला पुन्हा भेट दिली. सहा वर्षापूर्वी दोनदा कॅम्पसाठी इथं आलो होतो. त्यावेळच्या सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. स्मारकाची जागा, सभागृह, पारंब्या लटकणारं वडाच झाड, कँटिंन आणि समोरच छोटसं मैदान. सगळं काही आता नव्यासारख वाटत होतं. नवे सभागृह छान झाले आहेत. शनिवारी शरद पवारांच्या हस्ते इथल्या काही नव्या वास्तूंचा लोकार्पन सोहळा पार पडला. त्याच्या रिपोर्टिंगसाठी इथं आलो होतो. सेवा दलाचे अनेक जुने कार्यकर्ते भेटले. या जागेविषयी त्यांची असलेली प्रचंड आस्था, नव्या पिढिला घडवण्यासाठी ते करत असलेली धडपड जवळून पाहायला मिळाली. बाबा आढाव, युवराज मोहिते यांच्या भाषणातून या कार्याची तळमळ कळली. नरेंद्र दाभोळकरांना आदरांजली वाहणारा फलक दिसला. आणि आम्ही गेल्या शिबिरात घेतलेलं अंनिसचं शिबिर आठवलं. तेव्हा फार सिरिअसली केल होतं. सातत्य ठेवता नाही आलं त्यात, याची आता खंत वाटते. अर्थात मी काही सेवा दलाचा कार्यकर्ता नाहीये. मी स्वतःला सत्यशोधक विचारांचा पुरस्कर्ता म्हणवतो. त्यामुळं इतर कार्यकर्त्यांच्या कामाबद्दल आस्था वाटते. शेवटी काय मानवतेचे विचार सांगणारे, सुरुवातीला सगळेच आपले वाटतात. मग तिथून पुढे विचारांना फाटे फुटल्यावर आपणही फारकत घेत आपल्या रस्त्यावर येतोच.
मागच्या दोन वेळा जेव्हा मी इथं आलो होतो. त्या दोन्ही वेळेला माझ्या विचारात आणि आजच्या विचारांत फार बदल झालेला आहे. अर्थात आठवणीतून बाहेर आल्यावर हे वास्तव जाणवलं. फॉर अ चेंज करता पहिल्यावेळेला इथं आलो होतो. दुसऱ्या वेळेला कार्यकर्ता म्हणून. कार्यकर्ता? कोणत्या विचारांचा, संघटनेचा किंवा चळवळीचा, हे पक्क नव्हतं. असं आता वाटतयं. उत्साही होतो. इतरांपेक्षा काहीतरी  वेगळं करतोय, असं वाटायचं. बस्स तेवढच.
पहिल्या शिबिराला मी, निल्या (निलेश गोसावी) आणि हेम्या (हेमंत जांगली) फक्त टाईमपास म्हणून गेलो होतो. वर्ष २००६ होतं. अजित आणि प्रभाकरची मैत्री शिबिरात जमली. प्रमोद आणि चंदन शिबिराचे आयोजक होते. मी कॉलेज फक्त बारावीपर्यंतच केलं होतं. त्यातही एक वर्षाचा गॅप. शाळेतही कधी सहलीला गेलो नव्हतो. राहते शिबिर माझ्यासाठी नवीन होतं. आमचा एकांकिकेचा ग्रुप असल्यामुळे आम्हाला फक्त टाईमपासच अपेक्षित होता. पण प्रमोद त्यावेळी भारावलेला कार्यकर्ता होता. त्याने शिबिरालाही थोडसं वैचारिक वळण दिलं. सुरुवातील उमजायला, पटायला जडच गेलं. पण नतंर मजा आली. नितीन आणि महेशची शाहिरी गाणी ऐकून अजून जोर आला. तीन दिवसापैकी अंनिसचं शिबिर, पथनाट्य आणि एक दिवस कसल्यातरी जड चर्चेत घालवला. येताना रेल्वेत मग मीही क्रांतिगितात कोरसला सामिल झालो. गाणी झाल्यावर प्रमोद नारे द्यायचा. आम्ही पण नारे द्यायचो. त्यातला एक नारा होता, लाल सलामचा... मला त्यावेळी त्याचा अर्थ माहित नव्हता. सगळे देतायतं आपण पण देवू. कालातंराने त्याचा अर्थ कळला. पुन्हा कधीच तो नारा दिला नाही.
या शिबिरानतंर आयुष्याला थोडी कलाटणी मिळाली. वाचायची सवय लागली. मी नास्तिक का आहे, हे भगतसिंहाच पुस्तक वाचनात आलं. डोक्याला जोरदार सणक बसली. ज्या गोष्टींच्या तळ्यात-मळ्यात राहायची सवय होती. ती आता स्पष्ट झाली होती. इथून पुढ मग वाचायचा, चर्चा करण्याचा नाद लागला. प्रोत्साहनाचं प्रोटिन द्यायला प्रमोद होताच. शिवाय आणखीही मित्र. चागंला ग्रुप जमला होता. रोज वाचन, चर्चा, गाण्यांची तालिम, पथनाट्याची तयारी, असं काही ना काही चालू असायचं. बरं वाटत होतं. असंही काजूपाड्याच्या झोपडपट्टीत त्यावेळी याच्यापेक्षा दुसरं काही चागंल करण्यासारख नव्हतं.
वर्ष २००७ ला पुन्हा शिबिर आयोजित करण्यात आलं. अर्थातच यावेळी मी कार्यकर्ता होतो. मुळात शिबिराचा उद्देशच तो होता. निल्या यावेळी शिबिराचा आयोजक झाला होता. साला आदल्या वर्षी एवढे किडे केले होते. आणि यावर्षी हा साळसुदपणे डायरेक्ट आयोजक झाला. आम्ही फार जोमाने शिबिरासाठी काम केलं. नुतन, श्रद्धा, प्रियांका यांनी मुलींना शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले. आम्ही मुलांना. सर्वांची मेहनत सफल झाली. साठ जणांची विक्रमी (आमच्यासाठी विक्रमीच) नोंद झाली. प्रत्यक्षात साठ पेक्षा अधिक मुलं शिबिराला आले. हे तीन दिवस माझ्यासकट शिबिरातील इतर लोकही कधीच विसरु शकत नाही. मंतरलेले दिवस होते. अंनिसच शिबिर, पथनाट्य कार्यशाळा, चर्चासत्र असा भरगच्च कार्यक्रम. आमचा नवा मित्र विजय सुतारही आला होता. त्यानेही त्याचे कल्पक खेळ घेवून चांगलाच टाईमपास केला. माझे दोन भाऊ आणि बहिन मी शिबिरासाठी घेवून आलो होतो. माझ्या विचारात जसा बदल झाला तसा त्यांच्यातही व्हावा, अशी माझी इच्छा होती. पण ते काही झाल नाही. असो.
शिबिरात अनेक बऱ्या वाईट घटना घडल्या. काही तिथंच कळल्या. काही परत आल्यावर. पण आज मागे वळून पाहताना त्यातल्या फक्त चांगल्या गोष्टी दिसतायतं. अर्थात वाईट गोष्टी घडल्या, असं आज म्हणता येत नाही. त्यावेळी तसं वाटत होतं. आजही तेच वाटतयं? तर अजिबात नाही. कधी कधी कमी अनुभव किंवा आततायी स्वभाव काही गोष्टी करायला भाग पाडतो. फार कमी वेळात मी स्वतःला कार्यकर्ता म्हणून समजायला लागलो होतो. त्यामुळे घटनांच विश्लेषन करण्यात कमी पडलो. माझ्यासकट इतरही. आज असं वाटतं वेगळा मार्ग काढला असता तर... पण माझ्या एकट्याच्या हातात काहीच नव्हतं.

आज स्मारकाला भेट दिल्यावर पुन्हा त्या सर्व आठवणी डोळ्या समोर तरळल्या. सहा वर्षांनी इथं आलो होतो. सहा वर्षात खूप बदल झाले. काही आजही मित्र म्हणून आहेत. काही नॉट रिचेबल. काहींना मीच टाळतोय. दरवर्षी इथचं शिबिर घ्यायचं. भरपूर कार्यकर्ते घडवायचे, असा आणाभाका त्यावेळी घेतल्या होत्या. वैचारिक गफलतीमुळे म्हणा किंवा इच्छाशक्तीच्या अभावामुळे पुन्हा साने गुरूजी स्मारकाला शिबिर घेणे जमलेच नाही. प्रमोद मात्र आजही शिबिरं, कार्यशाळा घेत असतो. यापुढे जर कार्यशाळेत जाण्याचा योग आला तर नक्कीच जाईल.